हिंडेनबर्ग अहवालावरून निर्माण झालेल्या गदारोळावर काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या मालकीच्या एनडीटीव्ही इंडिया या दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केलेल्या मतांमुळे विरोधी पक्षांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. त्यावर आज आज सकाळी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जेपीसी का नको याबाबत आपले मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, २१ लोकांची जेपीसी असेल तर त्यात १५ लोक सत्ताधारी भाजपाचे असतील आणि फक्त ६ ते ७ जण विरोधी पक्षातील असतील तर विरोधी पक्षाची संख्या कमी आणि सत्ताधारी अधिक याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी अपेक्षा आहे त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी आहे अशी भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शरद पवार यांनी, जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि इतर लोक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक गोष्ट केली, किती दिवसात अहवाल द्यायचा (टाईम पिरियड) याबाबतची सूचना केली आहे. जेपीसीला सरसकट विरोध करत नाही. यापूर्वी काही जेपीसी होत्या त्या जेपीसीचा चेअरमन होतो असे शरद पवार यांनी सांगतानाच जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्याचा दुरुपयोग होणार असल्याने जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रमाणशीर ठरेल असेही स्पष्ट केले.
हिंडेनबर्ग कंपनीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मला हिंडेनबर्ग कोण आहे हे माहीत नाही. त्यांचा रिपोर्ट वर्तमानपत्रात वाचला. एक कंपनी परदेशातील ती या देशातील परिस्थितीवर भूमिका घेते. त्यावर किती लक्ष केंद्रित करावे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची कमिटी ही अत्यंत प्रमाणित ठरेल असे स्पष्ट करतानाच कुठची बाहेरची संघटना आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातील सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सांगितले तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल असेही म्हणाले.
राजकिय वक्तव्यावरून उठलेल्या वावटळीवर बोलताना शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षातील लोकांचे जे मत आहे त्यांचा सन्मान करतो. त्यांना माझे मतही सांगेन पण चर्चा होईल त्यावेळी यावर बोलेन, असे स्पष्ट करतानाच १८ -१९ विरोधी पक्ष एकत्र आले ही गोष्ट खरी असली तरी या पक्षातील लोकांना त्या जेपीसीमध्ये संधी मिळणार नाहीय. कारण ज्यांची संख्या एक – दोन आहे त्यांना संधी मिळणार नाही. ठराविकांनाच संधी मिळेल हेही सांगितले.
खरे सांगायचे तर २० हजार कोटी वगैरे याची आकडेवारी माझ्याकडे नाही. याबाबतची माहिती घेऊन बोलेन. एखाद्या गोष्टीवर बोलायचे तर त्याची माहिती माझ्याकडे असणे आवश्यक आहे. ती माहिती माझ्याकडे नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ज्यावेळी अनेक पक्ष एकत्र येत असतात त्यावेळी काही प्रश्नांवर मतभिन्नता असू शकते. उदाहरणार्थ खैरे यांच्या घरी बैठक घेतली, त्यावेळी सावरकरांचा विषय निघाला. त्यावेळी त्या बैठकीत सावरकरांबद्दल भूमिका मांडली. चर्चा झाली परंतु त्यानंतर विषय संपला. त्यामुळे चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते, मते मांडण्याची संधीही असते असेही शरद पवार म्हणाले.