Breaking News

उध्दव ठाकरेंचे भाजपासह शिंदे गटाला आव्हान, तुम्ही मोदींचा आणा मी माझ्या बापाचा फोटो आणतो.. महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून आज मांटूंगा येथील षण्मुखानंद हॉल मध्ये शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज भाजपासह शिंदे गटाला खुले आव्हान देत म्हणाले, निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते मान्य आहे. त्यामुळेच तर खोकेवाले बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. आज तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? असं थेट आव्हानच दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी आज निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास कार्यक्रम मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उध्दव ठाकरे यांनी निशाणा साधताना म्हणाले, तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी. आमचं ठीक आहे विदाऊट मेक अप शिवाय नाटक करता येते. गद्दार विकले जाऊ शकतात, गद्दार विकत घेता येऊ शकतात. मात्र हे जे काही चैतन्य आहे ना? ते कधीही विकत घेता येणार नाही. संजय राऊत गोऱ्या माणसांचे अनुभव सांगत होते. आज मलाही एक माहिती कळली. मला थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. काळजीत होते. मला म्हणाले मी मुद्दाम आलो आहे. कारण उद्या मी भाजपात चाललो आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एफबीआयने रेड टाकली, तेव्हा खोकेवाले त्याला बोलले की तू असा कसा? भाजपात ये किंवा मिंधे गटात ये. त्यानंतर नीट झोप लागेल. ज्यांना झोपायचं आहे त्यांनी झोपा. उठूच नका असा टोलाही लागवला.

काही वर्षांपूर्वी कलिना विद्यापीठात कार्यक्रमात होता. त्यावेळी रामदास आठवले होते. ते मला म्हणाले की तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही बाबासाहेबांचे वैचारिक नातू. त्यांना म्हटलं मग सोबत या, ते सोबत आले पण आता ते त्या कळपात गेले. काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो. तिथे दुभाषी घेऊन गेलो होतो. तो काळ साधारण काही दिवसांनी तिथे ऑलिम्पिक होणार होतं. मी आदित्यला म्हणालो तु चांगला इंग्लिशमध्ये फाडफाड बोलतो त्याला म्हटलं बिजिंगमध्ये जा तिथे चांगले पैसे मिळतील. तर तो म्हणाला बिजिंग मध्ये मी जाणार नाही कारण मला जगायचं आहे. मी विचारलं असं का? तर त्याने मला सांगितलं की तिथे कुणी सरकार विरोधात दोन शब्द बोललं तर तो माणूस गायब होतो. अशीच पकड भारतातलं सरकार हुकूमशाही आणू पाहात आहेत असा आरोपही उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, वडील चोरणारी ही अवलाद आहे. स्वतःचे वडील लक्षात ठेवा म्हणजे झालं, नाहीतर स्वतःचे वडील विसरायचे. परवा पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते तर त्यावेळी ते मिंधे म्हणाले आम्ही मोदींची माणसे, तर काल म्हणाले शरद पवार गोड माणूस. सरकार चालविण्यासाठी त्यांचे फोनवरून मार्गदर्शन घेत असतो. मग आम्ही काय करत होतो असे सांगत शिंदेवर निशाणा साधला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुलींचं वक्तव्य मी ऐकलं. त्या म्हणाल्या नेताजींचा वारसा ढापण्याचा डाव आहे. इथेही तेच तेच चाललं आहे. सरदार पटेल आमचे, बाळासाहेब आमचे, बाबासाहेब आंबेडकर आमचेच. मोदी के आदमी, चेहरा बाळासाहेबांचा का? कारण बाळासाहेबांच्या फोटो शिवाय मतं मिळत नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? महाराष्ट्रात निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांना पर्याय नाही. हे मोदींनाही मान्य आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे असं मोदी म्हणाले ते भयंकर आहे. त्यांचे बोलणे नीट ऐका FD म्हणजे काय? ते मुंबई महापालिकेचे हजारो कोटी आहेत ते कुणी दिले? तेव्हाचे जे लोकप्रतिनिधी, आयुक्त यांनी जी मेहनत केली त्यामुळे या ठेवी झाल्या आहेत. पण यांचा डाव त्या ठेवी हडप करण्याचा डाव आहे. गुजरातमध्ये प्रकल्प पळवायचे, फिल्मसिटी पळवायची, जनतेच्या पैशांवर डल्ला मारायचा असा आरोपही केला.

आपण जो कोस्टल रोड करत आहोत तो टोलमुक्त असणार आहे. नागरिकांना टोल लागणार नाही. तर राज्य सरकार जे करणार आहे त्यावर टोल लागणार आहे अशी खोचक टीका करत पंतप्रधान मोदींनी मुंबईत येऊन ज्या कामाचे उद्घाटन केले तीच कामे करत होतो असे सांगत मुंबईला भिकेला लावायचं, कंगाल करायचं हा डाव आहे. यांची वाईट नजर मुंबईवर पडली आहे असा आरोपही त्यांनी भाजपावर केला.
ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे ती आम्ही तुमच्या हातात पडू देणार नाही. ही कसली बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेणारी माणसं? असा सवाल त्यांनी यावेळी शिंदे गटाला केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *