विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विरोधकांची पत्रकार परिषद विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षिय विरोधकांची झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी कडक भाषेत शिंदे गटाच्या आमदारांना फटकारत चांगलाच जाब विचारला. यापार्श्वभूमीवर काल रात्रीपासून भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून काही ट्विटस करत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या भेटीला जाणार असल्याचे भाकित केले.
त्यामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात कोण तो राष्ट्रवादीचा मोठा नेता अशी चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विरोधात असलेल्या सिंचन घोटाळ्यात देण्यात आलेली क्लिन चीट अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्विकारली नसल्याची माहिती बाहेर आली.
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री काही ट्वीट्स करून सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कंबोज यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये एसीबीनं दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याची बाब समोर आली आहे.
संबंधित अहवाल मागील दोन वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती एका दूरचित्रवाहिनीने दिली. यामुळे आता अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, २०१९ मध्ये अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीनं क्लीन चिट दिली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. याबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. पण गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा अहवाल अद्याप स्वीकारला नाही. दोन वर्षांपासून हा अहवाल प्रलंबित आहे.
त्यामुळे सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. खरं तर, भाजपा नेते मोहित कंबोज यांनी काल काही ट्वीट्स केले होते. संबंधित ट्वीटमधून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं म्हटलं होतं. दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली होती.