राज्यात शिवसेनेच्या बंडखोरांना सोबत घेत भाजपाने सत्ता स्थापन केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बसविले. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका काढून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर यंदा भाजपाकडून दही हंडी उत्सवाच्या आयोजन करत एकप्रकारे आव्हान दिले. गिरगावातील आज दही हंडीच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे हे उपस्थित राहण्यासाठी आले त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आशिष शेलार यांना खोचक टोला लगावला.
वरळीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या काही विधानांचा संदर्भ आहे. आशिष शेलार यांनी विधानभवनात बोलतानाच वरळीबाबत, आम्ही गड वगैरे काही मानत नाही, आदित्य ठाकरे स्वत: आमच्या मतांच्या जिवावर निवडून आले आहेत, असं म्हणत या वादाला तोंड फोडलं. यानंतर सचिन अहिर यांनी देखील आशिष शेलार यांना खुलं आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवून जिंकून या असे आव्हान दिले. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी या सर्व वादावर प्रतिक्रिया दिली.
वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी करून भाजपानं शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याबाबत विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी या सगळ्या प्रकाराला बालिशपणा असल्याचे सांगत म्हणाले, मला आनंद आहे. त्यांनी येऊन वरळी बघावं. वरळी सगळ्यांना आवडायला लागलं आहे. वरळी ए-प्लस झाली आहे. तरी देखील मी सांगितलं त्याप्रमाणे या बालिशपणात आम्ही जाणार नाही. ज्यांना कुणाला कुठेही हा उत्सव साजरा करायचा असेल, तिथे करू द्या. आजचा दिवस कार्यकर्त्यांना आमनेसामने आणून वाद घालण्याचा नाही. लोक आनंद घेत आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नसल्याचे मतही केले.
जांबोरी मैदानात सुशोभिकरण आणि दुरुस्ती केल्यानंतरही तिथे दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यावरून सचिन अहिर यांनी आक्षेप घेतला. याबाबत आदित्य ठाकरेंनीही हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं. मला वाटतं स्थानिक नागरिकांनी याविरोधात काही पत्र देखील दिली आहेत. आपण जे काही करू, ते आनंदाने करू. उगीच कुणाला तरी डिवचणं हा सगळा पोरकटपणा झाला. यात मला जायचं नसल्याचेही ते म्हणाले.