पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवसांनी केंद्र सरकारने डिझेल, घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून पाच दिवसात ३ रूपये २० पैशांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ तर घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची दरवाढ केली. याप्रश्नी देशाच्या अर्थमंत्री बोलण्याऐवजी त्या काश्मीर फाईल्स या सिनेमावर बोलत आहेत असा उपरोधिक टोला लगावला.
इतक्या मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने मोदीजी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये सबंध देशाला ‘अच्छे दिन’ चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने देशाच्या नागरिकांवर पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निमित्ताने फार मोठे आर्थिक संकट आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मोदीसाहेबांच्या राज्यांमध्ये केंद्र सरकार कुठलाच आर्थिक बोजा सहन करायला तयार नाही म्हणून कुठलीही दरवाढ झाली तर ती थेट नागरीकांच्या माथ्यावर मारायची असेच धोरण भाजप सरकारचे आहे असा आरोपही त्यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु काश्मिर फाईल सारख्या विषयाची जेव्हा अर्थमंत्री चर्चा करतात तेव्हा या सरकारचं लक्ष नेमकं कुठे आहे हे आपल्याला दिसून येते असा उपरोधिक टोलाही लगावला.
महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही ही वस्तुस्थिती आज जनतेपासून लपलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली.