केंद्र सरकार ईडी, सीबीआयचा वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादी याचा नक्कीच समाचार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर संकल्प सभेत दिला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. या संकल्प सभेत शरद पवार यांनी सर्वच विषयांना हात घालताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
आजची ही सभा ऐतिहासिक अशी आहे. गेले वर्षभर अनेक संकटे असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जयंत पाटील व त्यांचे सहकारी यांना घेऊन प्रचंड दौरा केला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मोहिमेचा समारोप शाहू नगरीत होतोय त्याबद्दल अभिनंदन.
संघर्षाचा काळातून आपण जातोय त्यामुळे देश व राज्य एकसंघ ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली उन्नतीची खबरदारी घेतली गेली होती. मात्र २०१९ मध्ये भाजपची सत्ता आली. लोकांचा कौल होता. परंतु सत्तेचा उपयोग कसा होतोय हे आपण बघत आहोत. समाजातील सर्व घटक एकत्र राहतील ही नेतृत्वाची जबाबदारी असते. परंतु आज दिल्लीत हल्ले, जाळपोळ झाली. केजरीवाल यांच्या हातात सत्ता आहे. परंतु गृहखातं अमित शहा यांच्या हातात आहे. देशाची राजधानी एकत्र राहण्याची खबरदारी घेतली नाही. दिल्लीत काही घडले की त्याचा संदेश जगात जातो असेही ते म्हणाले.
मागच्या आठवड्यात कर्नाटकात होतो. तिथेही जातीय दंगली झाल्या. समाजातील लहान घटक आहेत तिथे अल्पसंख्याक लोकांबद्दल जाहीर बोर्ड लावले आहेत खरेदी न करण्याचे यातून काय संदेश देतो आहोत. हा संदेश सत्ताधारी देत आहेत. भाजपची सत्ता त्याठिकाणी असे प्रकार घडत आहेत. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी उमेदवार दिला त्याला विजयी केल्याबद्दल आणि उत्तम काम केल्याबद्दल व आघाडी धर्म पाळल्याबद्दल शरद पवार यांनी कोल्हापूरकरांचे अभिनंदन केले. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार आहे. परंतु विध्वंस वाढेल असा प्रकार झाला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काश्मीर पंडितांवर सिनेमा आला त्यात अत्याचार दाखवण्यात आला. त्यात जातीय संघर्ष दाखवला गेला आहे. आणि त्यातून मताचा जोगवा मागण्याचा प्रयत्न झाला. माणसामाणसामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांची जोरदार खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. पराभव झाला की कुठेतरी जाईन बोलले होते. त्यावेळी सभेतून हिमालयात असे शब्द आले त्यावेळी शरद पवार यांना हसू आवरले नाही. त्याचा बंदोबस्त केलात त्याबद्दल कोल्हापूरकर हुशार आहात अशी शाबासकी त्यांनी यावेळी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी इथे घोषणा केली मात्र निकाल लागल्यानंतर ते हिमालयात जातायत की नाही यामुळे माझी काळजी वाढली असा टोला लगावत शरद पवार म्हणाले, त्यातच आमचे जयंत पाटील त्यांना सोडायला जाणार होते असे सांगत दरम्यान कोल्हापूरचा निकाल देशासमोर गेला आहे असे सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. जगातील नेते भारतात येतात. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांचा काळ पाहिला असे सांगतानाच दिल्लीत आल्यावर सध्या काय चित्र दिसते. डोनाल्ड ट्रम आले गुजरातला गेले. इतरही जगातील नेते आले. गुजरातबद्दल माझ्या मनात यत्किचिंतही शंका नाही. परंतु ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनी संपूर्ण देशाकडे लक्ष देण्याची गरज आहे. एका राज्यात पाठवण्याचे काम होत असेल तर तुमच्या मनात इतर राज्याबद्दल काय आहे हे स्पष्ट दिसते असेही त्यांनी सांगितले.
सत्तेचा गैरवापर होतोय. ईडी सीबीआय इन्कमटॅक्स यांना पाठवली जात आहे. दबाव आणला जातो. राष्ट्रवादीच्या दोन सहकार्यांना जेलमध्ये टाकले. एखादा अधिकारी चुकीचा वागत असताना त्याच्यावर कारवाई होत नाही. आमचे नवाब मलिक यांच्यावर नाहक कारवाई झाली २० वर्षाची जागा घेतली. त्यावेळी त्यांना हे दिसले नाही. वस्तूस्थिती एक आणि सांगायचं दुसरं… माझ्यावर टिका केली प्रसिद्ध मिळते. काही लोक मी शाहूचेच नाव का घेतो बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही. महाराज तुमच्या – माझ्या हदयात आहेत. राजे अनेक होऊन गेले. परंतु ३०० – ४०० वर्षानंतर कोणत्या राजाची आठवण राहते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची असे सांगत राज ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.
छत्रपतीचे रयतेचे राज्य होते. त्यांचे काम तुमच्या – माझ्या अंतःकरणात आहे त्यांचे नाव घेत नाही म्हणून टिका करायची. शाहू महाराज आगळा – वेगळा राजा होता. हे सांगताना शाहू महाराजांचा एक अनुभव शरद पवार यांनी सांगितला. शाहू नगरीत चित्ररुपात इतिहास ठेवला आहे. राज्य सामान्यांच्या हितासाठी चालवायचे असते. शाहू महाराज यांचं नाव घेणं हा अभिमान आहे असे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिशा पाणी व वीज याबाबत दिली होती. देशाचे भविष्य उज्ज्वल कसे होईल यासाठी. शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेणे हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असेही ते म्हणाले.
देशाचा नकाशा बदलायचं आहे. या जातीयवादी लोकांना खड्यासारखे बाजूला करायचं आहे आणि शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकाराची जबाबदारी घेतली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.