मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नवनियुक्त मंत्र्यांनाही सल्ला देताना म्हणाले, सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावे असे आवाहनही केले.
१७ ऑगस्टपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सभागृहात मांडणार असून जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधी वाढवण्यात यावे अशी मागणी होती असेही त्यांनी सांगितले.
गेल्या ४० दिवसापासून राज्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गोगलगायींचे आक्रमण वाढले आहे. मात्र सरकार अजूनपर्यंत तिथे पोहोचले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
शिवसेनेने आधी चर्चा करायला हवी होती-जयंत पाटील
सत्तांतरानंतर नुकतेच शिवसेनेकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांचे नाव विधान परिषदेच्या सभापतींकडे पाठविले. त्यास विधान परिषदेच्या सभापतींनीही मान्यता दिली. यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थोडीशी नाराजी व्यक्त करताना म्हणाले, ज्याची सदस्य संख्या सर्वाधिक त्याचाच विरोधी पक्षनेता बनतो हा सर्वसाधारण नियम आहे. मात्र विरोधी पक्षांमध्ये एकजूट रहावी यासाठी शिवसेनेने एकदा मित्र पक्षांशी चर्चा करायला पाहिजे होती असे सांगत उध्दव ठाकरे यांच्या निर्णयाबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
विरोधी पक्षांमध्ये एकजूट असेल तर त्याचा फायदा सभागृहात राज्य सरकारवर अंकुश ठेवायला आणि जनतेची कामे करून घ्यायला मदत होते असेही ते म्हणाले.