मराठी ई-बातम्या टीम
सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार करत हीच अक्कल का? असा सवाल करत अक्कल असणाऱ्यांकडे बँक आल्याचे वक्तव्य करत आता पुढील लक्ष्य महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री हवाय असे जाहीर केले होते.
नारायण राणे यांच्या या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेत, गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्ड कप जिकण्याची भाषा करण्यासारखे असल्याचा प्रत्युत्तर दिले.
नारायण राणे आणि भाजपाने काही जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली नाही. बँकेच्या निवडणूकीत २५ ते ५० मते असतात. आता अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आता राज्य जिंकण्याचे आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्लीतील क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर वर्ल्ड कप जिंकू म्हणण्यासारखे असल्याचा खोचक टोला त्यांनी राणे यांना लगावला.
राणे म्हणाले होते की कोण अजित पवार? त्यांनी अजित पवारांना ओळखण्याची गरज नाही. कारण त्यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला अजित पवार हे कोण माहित आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हा बँकेची निवडणूक जिंकल्यानंतर आता महाराष्ट्र जिंकू, सत्ता परिवर्तन करू असे दावे करत आहेत. हे सगळे ठिक आहे, भाजपावाल्यांना स्वप्न पहायची सवय आहे. त्यांनी कुशाल स्वप्न पहावीत. त्यात आता आणखी एकाची भर पडली असून त्यांना माझ्या शुभेच्छा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्हा बँकेची निवडणूकीच्या निमित्ताने नारायण राणे, नितेश राणे यांच्याबरोबरच महाविकास आघाडीच्या नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत यांनी उडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. त्यातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी निवडणूकीतील प्रचारावरून संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणावरून नितेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अटकेवरूनही येथील राजकिय वातावरण चांगले तापले होते. या निवडणूकीत राणे आणि भाजपाच्या पॅनलला ११ जागा तर महाविकास आघाडीच्या ९ जागांवर विजय मिळाला.