मराठी ई-बातम्या टीम
पवारांवर बोलणाऱ्या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी जोरदार फटकारले.
पवार मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झाले याची आठवणही मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतील पक्ष असून शरद पवार यांना फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते अशी टीका केली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या टीकेबाबत विचारले असता तरूणांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे असा सूचक टोला लगावत याबाबत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेत्या सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे उत्तर देतील असे सांगत फारसे बोलण्याचे टाळले. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी फडवीसांनी केलेल्या टीकेला प्रतित्त्युर दिले
आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक – नवाब मलिक
शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान उद्या शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल तो निर्णय गोव्यात प्रफुल पटेल जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर काँग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.