पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी शरद पवारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अतुळ भातखळकर यांच्यावर पलटवार करत म्हणाल्या, ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्रात शरद पवारांचं नाव आहे, हे अतुल भातखळकरांना कसं कळालं? ईडीची कागदपत्रे अशा प्रकारे लीक होत असतील, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.
ईडीकडून दाखल केलेल्या आरोपपत्राबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला जर जास्तीची काही माहिती असेल आणि ईडीकडून पेपर लीक होत असेल, तर मला दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी लागेल. कारण ईडीची कागदपत्रे काही लोकांकडे लीक होत असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.
मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंना अतिशय विनम्रपणे विनंती करते की, त्यांनी याबाबतची चौकशी लावावी. ईडीचे कागदपत्रे अशाप्रकारे लीक होणं देशासाठी हानीकारक आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे मी अमित शाहांकडे न्याय मागणार आहे. कारण मला देशाची काळजी आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी भाजपाचे नाव न घेता लगावला.
त्याचबरोबर जळगांव येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या दोन मुख्यमंत्रीच्या टीकेला प्रत्युत्तर दिली. त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे टीका, टीपण्णी होतच राहते.