Breaking News

एकनाथ खडसे म्हणाले, फडणवीसांना नेहमी मदत केली पण त्यांच्या आर्शिवादाने… गोपीनाथ मुंडे असते तर राजकिय परिस्थिती बदलली असती

जेव्हा विधानमंडळात देवेंद्र फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता, पण गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिलं होतं. असे अनेक विषय आहेत की देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची भूमिका मी सातत्याने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगत पण त्यांच्या आशिर्वादाने मला छळण्याचा प्रकार झाल्याचा दिसतोय असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ खडसे हे जळगांवात आले असता ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांचं स्वागतच केले. पण देवेंद्र फडणवीसांनी माझ्या चौकशा करणं, बदनाम करण्याचा प्रयत्न करणं, अंडरवर्ल्ड डॉनशी माझे संबंध जोडणं, दाऊदच्या बायकोशी माझं संभाषण दाखवणं, माझ्या पीएनं लाच घेतली, मी भूखंडात गैरव्यवहार केला असे खोटे आरोप केले. माझं तिकीट कापलं गेलं, माझी ईडीनं चौकशी केली अशा प्रकारे मला वारंवार छळण्याचा प्रकार त्यांच्या आशीर्वादाने झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिवंगत ज्येष्ठ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर त्यांनी या राज्याची राजकीय स्थिती बदलली असती. त्यांनी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदललं असतं, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते जळगावमध्ये बोलत होते.

गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रभर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते उभे केले. धनंजय मुंडे यांच्यासारखा एक युवा कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वात तयार झाला. आमची धनंजय मुंडे यांच्याकडून अपेक्षा आहे की गोपीनाथ मुंडे यांनी जी शिकवण दिलीय त्यांचा तो राजकीय वारसा महाराष्ट्रात असाच उच्चांकी पातळीवर न्यावा. त्या समाजाचं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रात करत रहावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्रात असते, तर राज्याच्या राजकारणात मागील ५-७ वर्षात जे अनुभवलं तो प्रकार झाला नसता. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात राज्याची आणखी भरभराट झाली असती. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे आम्हाला अचानक सोडून गेले अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *