राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा हा दिवस ज्यांच्यामुळे दिसला, देशासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले त्या सर्वांना अजित पवार यांनी यावेळी अभिवादन केले.
आज देशात महागाई, बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या आहेत. पण आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना त्याबाबत जास्त टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आजचा दिवस आनंदाने साजरा करू. या अमृतमहोत्सवी वर्षात काही ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जाऊ. वृक्षारोपण, रक्तदान, तसेच गरीबांना आपापल्या परीने मदत करण्याच्या दृष्टीने काही कार्यक्रम हाती घेता येईल, असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी केले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये खाते वाटपावरून नाराजी असल्याचे बोलले जात असल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, मंत्र्यांची नेमणूक करणे, त्यांचे खातेवाटप करणे हे सर्वस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या खात्याचे वाटप केले. मात्र आता काम करणारा काय कुठलंही खातं मिळालं तरी चांगलं काम करतोच की, त्यामुळे आता खाते वाटप झालेले आहे. मंत्र्यांनी आता जनतेची कामे करावी अशी सूचनाही केली.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, सेवा दल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, सेवादल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे उपस्थित होते.