Breaking News

नवाब मलिक म्हणतात, ही तर सुरुवात… एनसीबीच्या निर्णयानंतर मलिक यांचा सूचक इशारा

मुंबई: प्रतिनिधी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडी आर्यन खानसह ६ हायप्रोफाईल केसेसचा तपास करण्यासाठी एनसीबीचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी This is just beginning अर्थात ही तर सुरुवात असल्याचे ट्विट करत सूचक इशारा दिला.

हि व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी आणखी बरेच प्रयत्न करावे लागणार असल्याचेही मत या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले. तसेच वानखेडे यांच्याकडे असलेल्या २६ केसेसची चौकशी करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी ट्विटरवरून एनसीबीकडे केली.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी के.पी.गोसावी आणि भाजपा कार्यकर्ता मनिष भानुशाली सारख्या व्यक्तींची एक टीम तयार करून त्यांच्या माध्यमातून खंडणी वसुली सुरु केल्याचा आरोप केला होता. तसेच केवळ सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी खोटे जातप्रमाण पत्र सादर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांची बहीण जस्मीन वानखेडे यांनी दुबई आणि मालदीव येथे केलेल्या ट्रिपची माहितीही उघडकीस आणत असून सर्वात महागडे कपडे, पट्टा, बुट आणि घड्याळ वापरत असल्याबाबतचा आरोप नवाब मलिक यांनी करत त्यासंदर्भातील काही फोटोग्राफ त्यांनी त्यांच्या अंगावरील कपड्यासह उघडकीस आणले.

याशिवाय आर्यन खान प्रकरणातील एक पंच प्रभाकर सैल यानेही यासंदर्भात व्हिडिओ आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे आरोप करत आर्यन खान याला सोडविण्यासाठी त्याच्या वडिलांची मॅनेजर पूजा ददलानी हिच्याबरोबर मिटींग करून मोठी रक्कम मागितल्याचा आरोप करत त्यातील ८ कोटी रूपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणारा सॅम डिसुझा यानेही एका मराठी वृत्त वाहीनीला मुलाखत देताना आपण फक्त मध्यस्थ म्हणून के.पी.गोसावी याची पूजा ददलानी यांच्यासोबत मिटींग करू दिल्याचे सांगत ५० लाख दिले आणि त्यातील ३८ आणि ५ लाख असे पुन्हा परत घेवून संबधिताना दिल्याची कबुली दिली.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील गुढ आणखीनच वाढत समीर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यातच आज वानखेडे यांनी दाखल केलेले आर्यन खानसह ६ गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एनसीबीने विशेष तपास स्थापन करत त्या केसेसचा तपास हाती घेतला.

 

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *