रत्नागिरी: प्रतिनिधी
मुंबई आणि कोकणात सुरु असलेल्या जन आर्शिवाद यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यामुळे आलो आहे. या यात्रे दरम्यान काही घटना घडल्या. त्याचा सगळाच उल्लेख मी करत नाही. मात्र माझ्यावर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असून एखाद्या दरोडेखोराप्रमाणे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नारायण राणेच्या पाठी जास्त लागू नका नाही तर मी सगळचं बोलायला लागलो तर अवघड होईल अशा सूचक शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता दिला.
नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही जूने व्हायरस पुन्हा राज्यात आले असून त्यांचा बंदोबस्त करायला हवा अशा सूचक शब्दात राणे यांचे नाव न घेता इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी वरील वक्तव्य केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.
आपल्याच वहिनीच्या चेहऱ्यावर अॅसिड कोणी कोणाला फेकायला लावले? ज्यावेळी साहेबांना (स्व.बाळासाहेब ठाकरे) त्या २४ लोकांकडून धोका निर्माण झाला. त्यावेळी त्यांनी आपल्या सुपुत्राची आठवण काढली नाही की बोलावले नाही असे सांगत मी जर सगळेच बोलायला लागलो तर अवघड होईल असा इशारा देत घरात बसून पिंजऱ्यात बसून सत्ता कोणी चालवतो का? असा खोचल टोला मुख्यमंत्र्यांना लगावत सत्ता राबवायला घराच्या बाहेर पडायला पाहिजे असेही ते म्हणाले.
सुशांतसिंग आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाची केस अद्याप संपलेली नाही. दिशा सालियनवर बलात्कार करून तीचा खून करण्यात आला असून या प्रकरणात एका मंत्र्याचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोपाचा पुर्नरूच्चार केला.
आम्ही घरी नसताना चीवचीव सेनेचे काहीजण घरावर चालून आले. आता ते पुन्हा आल्यास त्यांचा योग्य तो सन्मान करू असा इशारा युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांना दिला.
आम्ही काही जन्माला आलोय ते काय आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्यासाठी नाही. आज तुम्ही सत्तेत आहात उद्या आम्हीही बसू राज्यात केंद्रात तर आमचेच सरकार आहे. ते आज सत्तेत असल्याने सत्तेचा माज दाखवित असल्याची टीका करत एका केंद्रीय मंत्र्यावर कारवाई करून कोणती बाजी मारलीत असा सवालही त्यांनी केला.
काहीजण म्हणतात की, भाजपा आणि शिवसेनेतील संबध बिघडले ते बाहेरचे जे आले त्यांच्यामुळे. मात्र असे काही नाही. आम्ही भाजपाची जी काही विचारधारा आहे ती स्विकारून आम्ही आलो आहोत. त्यामुळे इथे बाहेरचे आतले हा प्रकार नाही. एक दिवस हे दोन्ही राऊत बंधू शिवसेनेला तलावात बुडवणार असल्याचे भाकितही त्यांनी केले.
सध्या आवाज ठीक नाही, परंतु पुन्हा आवाज खनखणीत झाल्यानंतर पुन्हा खणखणीत वाचविणार असल्याचा इशारा त्यांनी देत उद्या जन आर्शिवाद यात्रेचा शेवटचा दिवस असून उद्या ही यात्रा सिंधुदूर्गात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.