Breaking News

उद्घाटन चिपी विमानतळाचे पण फटाके उडविले राणे आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात रंगला शाब्दीक सामना

सिंधुदूर्ग (चिपी विमानतळ) : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आणि केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु मंत्री नारायण राणे, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील एकमेंकांचे कट्टर दुश्मन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने हे दोघं काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहीले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र उध्दव ठाकरे यांन राणे यांच्या भाषणातील धागा पकडत म्हणाले की, जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला असा उपरोधिक टोला नारायण राणे यांचे नाव न घेता लगावत आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं असा शालजोडीही त्यांनी राणे यांना लगावली.

माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख. कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचे वैभव ही जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधला सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचं लोकार्पण आज झालेलं असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

पर्यटन म्हटल्यावर आपल्या समोर साहाजिकच राज्य येतं ते आपल्या शेजारचं राज्य गोवा. आपण गोव्याच्या विरोधातील नाही आहोत. पण आपली जी काय संपन्नता आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे. ते ही काही कमी नाही. काकणभर सरस आहे. कमी तर अजिबातच नाही. मग सुविधा काय आहे तिकडे. एवढे वर्ष विमानतळाला का लागले? एवढी खऱडीघाशी भांडी घाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यावर ते कसं मार्गी लागलं? पर्यटन, पर्यंटन, पर्यटन… आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटले असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. उर्वरीत गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं असे सांगत राणेंच्या बोलण्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मळमळीने बोलणं असल्याची उपरोधिक टीका करत मात्र त्याबद्दल मी नंतर बोलेन असा ते म्हणाले.

यावेळी केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खास शैलीत बोलताना म्हणाले की, हे विमानतळ उभारणीच्या कामाचे श्रेय माझ्या एकट्याचे आहे. १५ ऑगस्ट २००९ साली या जागेवर भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. पण समोर आंदोलन सुरु होत होतं की भूमिपूजन होवू देणार नाही. आम्हाला विमानतळं नको, विरोध होत होता. मी नावं घेतली तर राजकारण होईल. त्यामुळे माझ्या श्रेयाच्या जवळपास कोणाचे नावही फिरकू शकत नाही आणि लागू शकत नाही असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी लागवला. या जिल्ह्यात मी आल्यानंतर येथील विकासाच्यादृष्टीने अनेक गोष्टी केल्या. मी सीवर्ल्ड आणण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यासाठी लागणाऱ्या जमिन अधिग्रहणासाठी तेव्हाही अजित पवार हेच अर्थमंत्री होते. त्यांनी १०० कोटी रूपये दिले. मात्र त्यानंतर हा प्रकल्प कोणी रद्द केला, कोण तिथं आंदोलन करत होतं? असा सवाल उपस्थित करत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता आरोप केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *