मराठी ई-बातम्या टीम
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाचे पद काँग्रेसला देत त्यावर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने मागील आठ महिन्यापासून हे पद रिक्त असल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र या पदासाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नसले तरी राज्यातील महाविकास आघाडीने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष निवडणूक घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक २८ डिसेंबर रोजी होणार असून याविषयीचा कार्यक्रम सोमवारी २७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. त्याच दिवशी अध्यक्षपदासाठी अर्ज स्वीकारले जाऊन असून मंगळवारी आवाजी मतदानाने ही निवडणूक पार पडणार असल्याने महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.
अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक पार पडली. या बैठकीत २७ व २८ डिसेंबर रोजी विधिमंडळाचे कामकाज होणार असून पुरवणी मागण्यांसंदर्भातील विनियोजन विधेयक सोमवारी मांडण्यात येईल तर सत्ताधारी पक्षाचा ठराव मंगळवारी मांडण्यात येईल, असे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले. अध्यक्ष निवडीसंदर्भातील नियमातील सुधारणेला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. नियमावलीत झालेल्या बदलानंतर प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवडणूक होणार आहे.
यासंदर्भात आलेल्या वृत्तावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत अधिवेशन सुरु असताना सभागृहात घोषणा करण्याआधीच बाहेर प्रसारमाध्यमांमध्ये माहिती कशी येते असा सवाल सरकारला विचारला. त्यावर सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी उत्तर देताना म्हणाले की, त्यात होणार आहे असे दिलेले आहे. परंतु त्याची अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. ज्या दिवशी तो कामकाज पत्रिकेत असल्याचे दिसून येईल त्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे त्या निवडणूकीची अधिकृत घोषणा सभागृहातच होणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर सरकारने विधानसभआ अध्यक्षांची निवडणूक घेण्याचे निश्चितच केले असेल तर त्याआधी भाजपाच्या १२ आमदारांचे करण्यात आलेले निलंबन रद्द करावी अशी मागणी करत निवडणूकी आधी याबाबतचा निर्णय घ्यावा अशी पुन्हा आग्रही मागणी केली.
तसेच यासंदर्भात त्या १२ आमदारांनी निलंबनाच्या कारवाईचा फेरविचार करावा यासाठी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना एक पत्र लिहिल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
दरम्यान काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरी अधिवेशन सुरु होण्याआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत हे दोघेही दिल्ली दौऱ्यावर गेले आणि तेथे त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.