मराठी ई-बातम्या टीम
राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये या साठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून बंधीस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा ५० करण्यात आली आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री १२ वाजेपासून अंमलात येणार आहे.
परिपत्रकात पुढे असे ही नमूद करण्यात आले आहे की, अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम २० असेल. त्याच प्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळांवर, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास, २४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेले सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) १४४ सी आर पी सी लागू करता येईल. या शिवाय आदींच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील.
यापूर्वीच गृहविभागाने पर्यटनाच्या स्थळी म्हणून आणि नववर्षारंभाच्या स्वागतासाठी गर्दी होवू नये म्हणून मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. तसेच मिरवणूका काढण्यावर आणि जाहीर कार्यक्रम घेण्यावर निर्बंध जारी करण्यात आले. निर्बंध जारी करूनही नागरीकांकडून अद्याप म्हणावी तशी काळजी घेतली जात नसल्याने दिल्लीच्या धर्तीव राज्यातही कडक निर्बंध जाहिर करण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. त्यानुसार अखेर आज मध्यरात्रीपासून हे कडक निर्बंध जारी करण्यात आले.
काल एकट्या मुंबईसह महानगर प्रदेशात ४ हजार ५५३ इतके कोरोना बाधित तर ओमायक्रॉनचे १९८ रूग्ण आढळून आले. तत्पूर्वी मुंबईत ३९०० कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ८५ रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकाच दिवसात दोन्ही विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली.
राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधाची कॉपी:-