भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता भाजपाला देखील इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर मी कदापी स्वस्थ बसणार नाही असा संताप व्यक्त करीत माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी कारवाईला देखील घाबरत नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. राज्यपालांचे कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, महाराजांचे नाव घेऊ नये. मी ३ तारखेनंतर राज्यपालांच्या विरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढवणार असल्याचा इशाराही उदयनराजे भोसले यांनी दिला.
उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले असून प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मला खात्री आहे राज्यपालांवर कारवाई होईल.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपालांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा. माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही असे स्पष्ट करीत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पुन्हा एकदा भाजपा नेते पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली आहे. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तसेच शिंदे हे बाहेर पडल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवरायांना कोणी पकडून नेले नव्हते, तर त्यांचा विश्वासघात झाला होता. मात्र बेताल वक्तव्य करणाऱ्यांना विरोध करत नाही त्यामुळे हे असे वक्तव्य करतात यावरही त्यांनी संताप व्यक्त केला.