मुंबई: प्रतिनिधी
मोदीसाहेबांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत… राज्यमंत्र्यांना किती अधिकार… व कितीजण धोरण ठरवत आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत… त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही असा जबरदस्त उपरोधितक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.
१५ ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वेमंत्रालयाकडे आला नाही अशी टिप्पणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले.
रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही, मात्र बोलून कामे होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना १५ ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का ?-नवाब मलिक यांचा सवाल
हे सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे असा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत अशी भूमिका भाजप आमदारांची असेल तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी केली.
जो सुप्रीम कोर्टाचा आदर करत नसेल… स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल त्यांचं लोकं किती ऐकतील असा सवाल करत ते पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान मन की बात मध्ये भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे असे सांगितले होते. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सणासुदीला गर्दी करु नका याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे असे निर्देश दिले होते असे असताना भाजपचे आमदार अशी वक्तव्य करत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.