मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेणारे आणि त्याचा पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ बीडहून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. मात्र अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती यांनी तर या घटनेला केंद्र आणि राज्य सरकार जबाबादार आहे, असा गंभीर आरोप करत अपघात झाल्यानंतर लवकर आप्तकालीन मदत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे काय नियमावली आहे, का मदत वेळेवर पोहोचली नाही असा सवालही केला.
विनायक मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे. मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी असेही ते म्हणाले.
विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचे उत्तर आमच्याकडे नाही. बीडसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून ते आले. गरीब मराठा समाजाला झळ बसू नये यासाठी त्यांचा लढा सुरू होता. विनायक मेटे यांनी मराठा समाजाची बाजू प्रभावीपणे मांडली. मोठे बंधू म्हणून ते मला नेहमी सल्ला द्यायचे. सरकारवर दबाव टाकायचा असेल तर आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते नेहमी सांगायचे असेही त्यांनी यावेळी सांगितले.