राज्यसभा निवडणूकीतील पराभवाचे उट्टे काढण्यात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा सपशेल पराभव आल्याचे दिसून आले आहे. भाजपाकडे पुरेशी मते हाताशी नसतानाही भाजपाने आपला ५ उमेदवार प्रसाद लाड यांना विजयी करून आणण्यात मोठा चमत्कार घडवून आणला आहे. तर काँग्रेसला आपली मते न राखता आल्यामुळे अशोक भाई जगताप हे विजयी झाले आहेत. तर चंद्रकांत हंडोरे यांना भाई जगताप यांच्यापेक्षा जास्त पहिल्या पसंतीची मते असूनही पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे प्रसाद लाड यांना दुसऱ्या पसंतीची मते मिळवित विजय संपादन केला आहे. तर जगताप यांनाही दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारेच विजय मिळाला आहे. मात्र या निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, अनिल देशमुख हे तुरुंगातून येवू शकले नाहीत. तर मतदान झाल्यानंतर दोन मते बाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूण २८५ मतांपैकी २८३ मते वैध ठरली आहेत.
शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना प्रत्येकी २६ मते मिळली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निबांळकर यांना २८ मते, एकनाथ खडसे यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली होती. दुसऱ्या पसंतीची फारशी मते मिळाली नाहीत.
शिवसेनेच्या सचिन अहिर यांना २६ आणि आमशा पाडवी यांना २६ मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे ५५ आमदार असताना प्रत्यक्षात फक्त ५१ आमदारांनीच मतदान केल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना प्रत्येकी ३० मते, प्रविण दरेकर यांना २९ तर उमा खापरे यांना २७ असे मिळून भाजपाचे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले आहेत. तर तर पहिल्या पसंतीची मते भाजपाच्या प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचे १७ तर दुसऱ्या पसंतीची ११ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मते मिळाली होती. तर दुसऱ्या पसंतीची ७ मते मिळून त्यांनी २६ मतांचा कोटा पूर्ण केल्याने भाई जगताप विजयी झाले आहेत.
शिवसेनेची सदस्य संख्या ५५ असताना प्रत्यक्षात ५२ मतेच पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५१ मते होती. त्यात आणखी मतांची भर घालत राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना ५७ मते पडली. त्यामुळे राष्ट्रवादीला अतिरिक्त ६ मते मिळाली आहेत.
तर काँग्रेसकडे ४४ मतांचा कोटा असताना प्रत्यक्षात काँग्रेसला ४१ मते मिळाल्याचे दिसून येत आहे. यापैकी चंद्रकांत हंडोरे यांना २२ तर अशोक भाई जगताप यांना १९ मते मिळाली आहेत. यावरून काँग्रेसला ४१ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले.
मतांची छानणी करताना उमा खापरे यांच्या कोट्यातील एकामतावर काँग्रेस, राष्ट्रवादीने तर भाजपाने रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतला. त्यामुळे ही दोन्ही मते बाजूला ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. ही दोन्ही मते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत. या मतप्रश्नी निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर ती समाविष्ट करण्यात येतील किंवा ती बाद ठरविण्यात येतील. त्यानंतर अंतिम मतांची घोषणा करण्यात येईल. मात्र उमा खापरे आणि रामराजे नाईक निबांळकर यांचा विजय आधीच जाहिर करण्यात आला आहे. फक्त त्यांच्या मतातील आकडा फक्त वाढणार आहे.