मागील वर्षी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे. अशातच खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा किर्तीकरांनी प्रसारमाध्यमांशी केला.
गजानन किर्तीकर म्हणाले, आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. मात्र आता एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटक पक्षाचा दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे.
लोकसभेला २२ जागांवर दावा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर गजानन किर्तीकर म्हणाले की, दावा करण्याची गरज नाही. २२ जागा शिवसेनेच्या आहेतच. २०१९ साली भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. २६ पैकी भाजपाचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.
शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र डागलं आहे. फडफड करणाऱ्या कोंबड्यांच्या मानेवर भाजपा एकदाच सुरी फिरवेल. त्यांना लोकसभेला २२ नाहीतर ५ जागा जरी भेटल्या तरी खूप आहे. आम्ही मागील वेळी १९ जागांवर विजयी झालो होतो, आताही १९ जागांवर विजयी होणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.