मराठी ई-बातम्या टीम
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेतील चर्चेच्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या देशांतर्गत आणि आंतर राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नी केंद्र सरकारच्या धोरणाची चिरफाड करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवसांपासून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काल लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे देशभरात कोरोनाचा प्रसार केल्याचा आरोप केला तर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसमुळे देशाच्या माथी आणीबाणीचा कलंक लागल्याचे सांगत काँग्रेस नसती तर शिखांचे शिरकाण झाले नसते, अनेक राज्यातील सरकारे फेकून दिली गेली नसती, देशाचत स्वदेशीचा नारा झाला असता यासह अनेक गोष्टींना काँग्रेस जबाबदार धरले.
त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विचारले असता ते म्हणाले की, ते (पंतप्रधान मोदी) मागील दिवसांपासून संसदेत बोलत आहेत. मात्र त्यांनी अद्याप माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही. ते आजही चीन आणि पाकिस्तानच्या प्रश्नावर बोलत नाहीत. पण हा प्रश्न गंभीरपणे घेण्याची गरज आहे.
माझ्या पणजोबांनी देशाची सेवा केलीय त्यामुळे मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही सत्य कथन केल्यापासून भाजपा काँग्रेसला घाबरली असल्याची टीका त्यांनी केली.
He (PM Modi during his speech in Parliament) didn't answer my questions. We need to take the China & Pakistan issue seriously. My great grandfather served the country, I don't need anyone's certificate. BJP is scared of Congress as we say the truth: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/5tupzaIegk
— ANI (@ANI) February 8, 2022
काय म्हणाले मोदी राज्यसभेत
दरम्यान, राज्यसभेतील अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिख लोकांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मीर सोडावं लागले नसते. काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावर किती अन्याय झाला, गुजरातवर पण झाला. गुजरातमध्ये मी नेहमी म्हणायचो देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास करा. काँग्रेस तर याआधी साध्या साध्या गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांना हटवत होते. काँग्रेसने आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा निवडुन आलेल्या विविध राज्य सरकारला फेकून दिलं होतं, तेव्हा तुम्ही कोणत्या तोंडाने लोकशाहीबद्दल बोलत आहेत. एका पंतप्रधानांनी ५० राज्य सरकारला फेकून दिले. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. आज त्याची ते शिक्षा ते भोगत असल्याची टीका त्यांनी केली.