आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. त्यापूर्वी १५० वर्षे ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात होतो. त्यावेळी आपण गुलामगिरीत होतो. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, की देश पुन्हा गुलामगिरीकडे जात असेल, तर तुम्ही त्यावर तुमच्या ब्रशचे फटकारे मारलेच पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
मार्मिक या साप्ताहिकाच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उध्दव ठाकरे बोलत होते. या वर्धापन दिनाचा सोहळा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला.
राज्यात अद्याप खातेवाटप न झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला सवाल करत म्हणाले, राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं खातेवाटपच झालेलं नाही. सगळे मंत्री आज आझाद आहेत. आझादी का अमृत महोत्सव. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाहीये. करा मजा असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आम्हीच मूळची शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी खोचक उत्तर देत म्हणाले, काही जणांना असं वाटतं की शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे जी कुणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. पण तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमुळं ही किमान ६२ वर्ष तरी दिसत आहेत. माझ्या आजोबांनी ही विचारांची पेरणी केली होती. ती इतक्या सहजा सहजी नेता येणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी जीएसटीवरून, भाजपाच्या हर घर तिरंगा यावरून आलेली काही व्यंगचित्रेही दाखविली. तसेच अशा पध्दतीची व्यंगचित्रे व्यंगचिंत्रकारांनी काढायला पाहिजेत असेही ते म्हणाले.