नुकत्याच महाविकास आघाडीच्या बैठकीत मविआतील घटक पक्षांच्या मित्र पक्षांनाही आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटासोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मविआत स्थान मिळणार असल्याची शक्यता वक्त करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात खळबळजनक दावा केला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अद्याप राष्ट्रवादीत बरेच राजकारण घडायचे आहे. दोन बॉम्ब फुटलेत, अजून दोन बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. त्यामुळे ‘वेट ॲण्ड वॉच’ पण जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असा दावा केला.
अकोला येथील दंगलीसंदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर आंबेडकर यांनी भाकीत केले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची परिस्थिती असल्याची काँग्रेसने भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये बरेच राजकारण घडायचे आहे. त्यानंतर जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल, असे मी मानतो. त्यामुळे आघाडीत बिघाडी सुरु झाली असल्याचेही स्पष्ट केले.
दंगलीतून मतदान बदलण्याचा काळ संपला
राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून दंगेखोरांवर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या दंगली थांबणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले. कर्नाटकमध्ये धार्मिकतेवर नाही तर तेथील लोकांनी त्यांना जे योग्य वाटले त्यांना मतदान केले. त्यामुळे दंगलीतून मतदान बदलेल असा जो पूर्वीचा काळ होता तो आता संपलेला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा देऊ केली आहे. ती जागा पूर्वी आमचीच होती. या मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढविली होती असेही सांगितले.