राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. त्यातच राऊत यांच्या कोट्यातील शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरविले. तसेच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पुरेसं संख्याबळ असताना देखील पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी पहाटे निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
यासगळ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूकीतील संजय राऊत हे कसे काठावर वाचले याचा किस्साच सांगितला.
संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर सगळं उलट झालं असतं, असे सांगत छगन भुजबळ यांनी निवडणूकीतील अटीतटीच्या सामन्यातील काही गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची समीकरणं कशी फिरली याबाबत बोलून दाखवले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर आणखी उलट झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले.
मी स्वत: बैठकीत आमच्या आमदारांना निवडणुकीबाबत समजावून सांगितलं होते. त्यासाठी अहमद पटेल यांचं उदाहरण देखील दिले होते. आपण दिलेलं मत आपल्या प्रतिनिधीला दाखवायचं आहे. पण ते दुसऱ्यांना दिसता कामा नये. अपक्षांनी कुठलंही मत कुणालाही दाखवता कामा नये. कागदावर कुठल्याही प्रकारची खूण, बिंदू किंवा वेडीवाकडी रेष असता कामा नये, हे सर्व नियम आम्ही आमच्या आमदारांना समजावून सांगितले होते अशी माहितीही त्यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून यावेत, म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. अर्थातच ज्या काही चर्चा सुरू आहेत, महाविकास आघाडीला धक्का वगैरे, असं काहीही नाहीये. महाविकास आघाडीने सरकार स्थापन करताना ज्यावेळी बहुमत सिद्ध केलं, तेव्हा आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा होता. आता दोन चार मतं इकडे तिकडे झाली आहेत. पण याचा अर्थ हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असा होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.