मुंबई : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे ९ जिल्ह्यातील जनजीवनच विस्कळीत झाले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी JEE-Main ची परिक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केली. यासंदर्भात त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.
कोकण आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली, सातारा या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे पुराच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे JEE-Main ची नियोजित होणारी २५-२७ जुलै रोजी होणाऱ्या परिक्षेला ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर या भागातील सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी लवकरच नव्या तारखा जाहिर करण्यात येणार असल्याचे त्यांनी ट्विटरवरून जाहिर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
आतापर्यंत JEE-Main च्या दोन परिक्षा झाल्या असून आणखी दोनवेळा परिक्षा होणार आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी परिक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे परिक्षा न दिल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी हा निर्णय घेतला.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच कोकणातील चिपळूण, महाड सह इतर भागातही पूराने चांगलेच थैमान घातले.
पूर परिस्थितीमुळे नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या पथकांमार्फत करण्यात येत आहे. जवळपास या दोन्ही ठिकाणी ९० हजार नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच दरड कोसळलेल्या ठिकाणी ढिगाऱ्याखालील व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.