आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आणि तुरुंगात टाकण्याची सुपारी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या आरोपाला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपातील हवा काढून घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपण आपण दिलीप वळसे-पाटील यांच्यावर आरोप केलेच नव्हते असे सांगत वरून आदेश आले होते असा नवा आरोप केला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अशी कोणतीही चर्चा किंवा आदेश दिले नव्हते असे सांगत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देत होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाबाबत विचारले असता अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, उभ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आम्ही जे बोलतो ते किती स्पष्ट असते आणि खरे असते. आम्ही मनात कोणताही आडपडदा न ठेवता जे आहे ते बोलतो. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात तशा पध्दतीची कोणतीही चर्चा आणि आदेश कोणाकडूनही देण्यात आले नाहीत असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
मी असे पर्यंत आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत किंवा त्यानंतरच्या कोणत्याही चर्चे दरम्यान अशा प्रकारचे बोलणे झाले नाही. किंवा त्याबाबतची मुद्दाही कोणी उपस्थित केला नाही असेही स्पष्ट केले.