मराठी ई-बातम्या टीम
मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्यात येणाऱ्या संभावित लाटेला थोपविण्यासाठीच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की,
आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागतील. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहे. रुग्णसंख्या ३० हजारापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाचा आरटीपीसीआर केल्यास ताण पडेल. दीड ते पावणे दोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट करणार. अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्कद्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
फेवीपिराविर आणि मोनू पिरावीर ही दोन औषधे प्रभावी ठरत आहेत. मात्र मोनू पिरावीरची उपलब्धता नाही. एक लाख ड्रग्ज आहेत. अधिक डोस देण्याची केंद्राला विंनती केली असून आता क्वॉरंटाईनचा कालावधी ७ दिवसांचा करण्यात आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ज्या भाषेत समजत असेल त्यांना त्या भाषेत समजावून त्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने ऑग्युमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन शब्द वापरता येणार नाही. आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण नॉन इसेन्शियल अॅक्टिव्हिटी तपासणार. ज्या अॅक्टिव्हिटीची गरज नाही ती थांबवणार असल्याचे सांगत व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबविणे गरजेचे असून आजच निर्बंध आणावेत असे नाही. पण तपासून निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांना सर्व बाबी सांगून त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान संध्याकाळ पर्यत नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.