मराठी ई-बातम्या टीम
राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही. राज्य सरकारकडून सगळी मनमानी सुरु असल्याचा आरोप केला.
त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले की, असे नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेवूनच काम करण्यात येत आहे. देशातील रूग्णसंख्या वाढत असताना काळजी करण्याचे कारण आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी हे निर्बंध जारी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
रात्रीचे उद्योग करणाऱ्यांवर तुम्ही निर्बंध आणताय, आणायचेच असतील तर दिवसा चालणाऱ्या उद्योगांवरही आणा, अशी उपरोधिक मागणी चंद्रकांत पाटील यांनी करत आता जास्त निर्बंध आणून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसे होतं नाहीये. विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं नसतं. राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय अशी टीका त्यांनी यावेळी केली.
किमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तरी बैठकीत बोलवायचं, ते शासकीयदृष्ट्या शासनाचा भाग असल्याची आठवणही त्यांनी यावेळी राज्य सरकारला करून दिली.
याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सगळ्यांनाच विश्वासात घेतो. जर देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या येत असेल तर काळजी करण्याचा विषय आहे. रुग्णालयातील बेड्सची व्याप्ती किंवा ऑक्सिजची मागणी वाढली आहे किंवा गंभीर रुग्ण आहेत असेही नाही. संसर्ग टाळण्यासाठी हे निर्बंध आहेत. जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात आणि राज्यात गर्दी कमी करणे हाच एकमेव रामबाण उपाय असल्याचे स्पष्ट करत त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू केल्याचे त्यांनी सांगितले.