कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जे काही हायब्रीड रस्ते राज्यात उभारण्यात आले. त्या रस्ते उभारणीच्या कामात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचार प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी देत चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच किरीट सोमय्या यांनी आपल्यावर आरोप केल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेवून आरोप केल्याबरोबरच मुश्रीफ यांनी लगेच पत्रकार परिषद बोलावत सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील ९० टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, तसेच समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असे सूचक विधानही त्यांनी वेळी केले.
१२ वर्षापूर्वी चंद्रकांत पाटील कोल्हापूरात काय होते हे सगळं सगळ्यांना माहित आहे. आणि १२ वर्षानंतर सत्ता असताना काय होतं. केवळ आणि केवळ अमित शाह यांच्याबरोबरील दोस्तीमुळे चंद्रकांत पाटील यांना सगळं मिळाल्याचे सांगत हे आम्हालाही आधी कळलं असतं तर आम्हीही त्यांच्याशी दोस्ती केली असती. सत्तेत असताना किती खाती त्यांच्याकडे होती. आणि आता काय आहे? हे ही सगळ्यांना माहित असल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भात मी स्वत: चंद्रकांत पाटील यांना बोललोय तु नशीबवान आहेस, अमित शाहच्या मुळे तुला सगळं मिळालयं म्हणून असेही त्यांनी सांगितले.
आम्ही मात्र लोकांमध्ये राहीलो, उठलो त्यांची काम केली तेव्हा कुठे आम्ही मंत्री झालो. राज्याच्या मंत्रिमंडळात १७ वर्षे मंत्री राहिलो. पण या १७ वर्षात माझ्यावर एक ही डाग नाही की कोणाचे आरोप नाहीत. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळेच आतापर्यत राजकारणात असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमय्या जेव्हा तारखेला येतील तेव्हा त्यांनी कोल्हापुरात आल्यावर माहिती घ्यावी. भाजप कोल्हापुरात सपाट झाला आहे हे त्यांच्या लक्षात येईल. भाजपला कुठेही स्थान नाही. म्हणून चंद्रकांत पाटलांना पुण्यात जावे लागले. पुढील दहा वर्षे भाजपला कोल्हापुरात स्थान राहणार नसल्याचा दावा करत भाजपाला आव्हान दिले.
सोमय्या हे माझी प्रतिमा डागळण्यासाठीच बोलत आहेत. माझ्यावर जेव्हा जेव्हा असे आरोप केले तेव्हा तेव्हा आरोप करणाऱ्यांवर मी ५० कोटींचे दावे केले आहेत. आता सातवा दावा करणार आहे. १०० कोटींचा दावा करणार आहे. माझ्यावर कधीच कोणता आरोप झाला नाही. उलट तुमच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला.