Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी चुलत भावाची समजूत काढावी माजी आमदार लक्ष्मण माने यांची मागणी

गुढी पाडव्याल्या झालेल्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका घेत मौलवींसह राज्य सरकारला तीन मे चा अल्टीमेटम दिला. क्यामुळे राज्यात तणाव निर्माण होवू शकतो अशी भीती व्यक्त करत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपले चुलत बंधू राज ठाकरे यांना आवरावे अशी मागणी केली.
साताऱ्यामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने बोलत होते. ते म्हणाले की, राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, इतकच नाही तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधिमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्य सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय आहे? असा सवाल करत ज्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी सर्वसामान्यांना फसवण्याचा धंदा बंद करावा. कारण हिंदू राष्ट्रासाठी गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य, भटके, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, यहुदी, लिंगायत, जैन या जातीच्या लोकांना हिंदू राष्ट्र हवे आहे का? सवालही त्यांनी यावेळी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींचा अभ्यास करुन समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केले. त्यावर आक्रमण करुन भाजपाने देशात आणि राज्यामध्ये धुडगूस घातलाय असा आरोप करत राज ठाकरेंनी केलेली मागणी आणि भाजपाकडून होत असणाऱ्या संविधानावरील आक्रमणाचा निषेध करत राज ठाकरेंनी केवळ ठाकरे घरण्यात जन्म घेतलाय. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीमधील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्शाचा वारसा राज ठाकरेनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही तलवारी काढू, हे राज ठाकरेंचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे असं वक्तव्य करणं हा फौजदारी गुन्हा आहे. म्हणूनच पोलिसांनी तात्काळ त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्यांनी आपल्या भावाची (राज ठाकरेंची) समजून काढावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबद्दल मी स्वत: पत्र लिहून तशी विनंती करणार आहे. राज कोणाची तरी सुपारी घेऊन काम करतायत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे. देशात आणि राज्यामध्ये कायद्याच राज्य आहे. मात्र पंतप्रधान या राजकीय संवेदनशील परिस्थितीवर अवाक्षर काढत नाहीत. त्यांना जरा देखील लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. संघाला देशात फाळणीसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *