जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्येक वेळी भाजपाबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपा नेते जाण्याच्या कृतीत कोणताही खंड पडला नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे तीन बडे नेते राज ठाकरे यांच्या घरी गेले. त्यावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज ठाकरे यांना भेटले यातून काही स्पष्ट संकेत मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात आज बुधवारी नवी मुंबईत होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवरून खोचक टोला लगावला आहे. आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
गेल्या २४ तासात भाजपाचे तीन मोठे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे यातून भाजपासोबत युती होण्याचे काही संकेत मिळत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रामदेव बाबांच्या वक्तव्यावरही बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं. ते म्हणाले, रामदेव बाबा मुख्यमंत्र्यांना भेटूले बोलले की, एकनाथ शिंदे हे हिंदू धर्माचे सर्वात मोठे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका धर्माचे कसे होऊ शकतात.
लोकशाहीने, आपल्या घटनेने सर्वधर्मसमभाव हे सूत्र ठेवलं आहे. मुख्यमंत्री सर्वांचेच असतात. मी कोणत्याही एका धर्मापेक्षा सर्वांचा आहे, हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. किमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.