राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाही अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आलेले नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादाच बिन खात्याचे मंत्री ध्वजारोहण करणार असल्याची टीका केली. त्यावर जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे, सरकारचे काम मात्र लोकहिताचे निर्णय घेण्याचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगलीत बोलताना प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण बिनखात्याच्या मंत्र्याकडून होत असल्याची टीका नुकतीच केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधी पक्षांना लक्ष्य केलं. पहिल्यांदा अशी परिस्थिती आली आहे की बिनखात्याच्या मंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार आहे.
विरोधक या नात्याने टीका करणे हे कामच त्यांचे आहे. मात्र, सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून याची प्रचिती गेल्या महिन्याभरात घेण्यात आलेल्या निर्णयावरून आली आहे, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. आरोप करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आमचं काम आहे सरकार चालवणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणे. एका महिन्याभरात आम्ही जनहिताचे किती निर्णय घेतले ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे. पूरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पूरस्थितीत हानीग्रस्त भागातील लोकांचे पूनर्वसन करण्यात येत असून सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांच्या सुरक्षेसाठी सरकार लक्ष ठेवून आहे. प्रशासनाला आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.