Breaking News

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाला डिवचले, जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना… नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी लगावला.

शिवसेना उबाठा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली.यात उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला.

तर धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके आदी पदाधिकारी, तर धुळे शहरातील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, पुरुषोत्तम जाधव, शेखर दुधाने, धुळे ग्रामीण मधील संजय माळी, सुधाकर पाटील, किशोर माळी, किशोर देवरे, साक्री शहरातील महावीर जैन, नितीन गायकवाड, महेश खैरनार, हर्षल माळी तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे ५७ आणि ३ सहयोगी पक्षाचे असे ६० उमेदवार निवडून आले. त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत ही यावेळी व्यक्त केले.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याची आशा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *