जवळपास अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर जाहिर सभा घेतली. या सभेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापरावरून केंद्र सरकारला इशारा देत मनसे प्रमुख राज ठाकरेंवरही टीका केली. तसेच फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवरून कानपिचक्या दिल्या. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी हात जोडून म्हणाले की, मी यापूर्वीच सांगितले आहे की, मला ज्यावेळी वाटेल त्याबद्दल सांगेन.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत विचारले. त्यावेळी ते बोलत होते.
मी त्या वेळेस सांगितलेलं आहे मला वाटेल त्यावेळेस सांगेन, आता मला वाटत नाही सांगावंस, संपला विषय. मी तेव्हाच स्पष्ट केलं आहे. तुम्ही कितीही घोळून विचारलं तरी जोपर्यंत अजित पवारच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. आता तो विषय एवढा महत्वाचा आहे का? झालं अडीच वर्ष पाणी वाहून गेलं. सरकार आलंय सगळे व्यवस्थित काम करतायत असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
आम्ही नाही अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी भाषणात काढली असं पत्रकारांनी पुन्हा विचारल्यानंतर ते पुन्हा म्हणाले की, ठीक आहे अशी कोणाला तरी कधीतरी आठवण येते. आणि दुर्देव हे आहे की पहाटे, पहाटे पहाटे… तुमच्यामध्ये जर सकाळी आठला पहाटे म्हणत असतील तर तुम्ही धन्यच आहात सगळे जण असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांसमोर हात जोडले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आठ वाजता तो शपथविधी झाला. आमच्यामध्ये आठला पहाट म्हणत नाही. आमच्यामध्ये पहाट पाचला, चारला म्हणतात असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.