भाजपा आणि ईडी, आयकर विभागाच्या कारवाईमुळे अजित पवार हे साखर कारखानदारीच्या क्षेत्रात असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर मधल्या काळात ते इथेनॉलशी संबधित असल्याचीही माहिती पुढे आली. मात्र आपल्या व्यवसायासंदर्भात त्यांनी कधीच अधिकृतरित्या जाहीरपणे सांगितले नव्हते. मात्र आज त्यांनी स्वत:च ते कोणता व्यवसाय करतात हे जाहीर पणे सांगत, मी दुधाचा धंदा करणारा माणूस असून आजही माझा गोठा असल्याची माहिती जाहीरपणे कार्यक्रमात सांगितली.
पुरंदर येथील निबूत येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या व्यवसायासंबधी पहिल्यांदाच माहिती जाहीर केली. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणेही उपस्थित होते.
मी दुधाचा धंदा करणारा माणूस आहे. आजही माझा गोठा आहे. नवीन तंत्रज्ञान आणून गायींना १० च्या १० कालवडी होऊ शकतात असं तंत्रज्ञान आणल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीमध्ये आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रकल्प उभा केला आहे. त्यामध्ये तुमची गाई साधी असली तरी तिच्या गर्भाशयामध्ये उत्तम कालवड सोडण्यात येते. मी देखील दुधाचा व्यवसाय करणारा माणूस आहे. आजपण माझा काठेवाडीमध्ये गायींचा गोठा आहे. त्यावेळी दहा गाय व्यायल्या तर पाच कालवड आणि पाच खोंड व्हायच्या. निंबूकरांनो आता जगात चमत्कार झाला आहे. आपण ते तंत्रज्ञान इकडे आणले आहे. तुमची गाय कोणतीही असू त्याच्यामध्ये उत्तम दुभती कालवड सोडून ती त्याला जन्म देऊ शकते. त्यातून जास्त दुध देणारी गाय पुढे निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे इथून पुढे तुमच्या १० गायींना दहा कालवडी होणार आहेत. अशा प्रमाणे त्यामध्ये क्रांती केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मी निधी वाटपाच्या संदर्भात मुंबईत गेल्यावर आपल्या इथेही निधी देण्याचे काम करणार आहे. तुम्ही अजिबात शंका बाळगू नका. वाढत्या उंचीचा असल्याने आपल्या जवळच्या लोकांच्या ताटात जरा जास्तचं पडत असतं हे तुम्हाला माहितीच आहे. मी जेव्हा हे वाढपी म्हणून वाढणार आहे त्यावेळी सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न करेन. पण बारामती आणि निंबूला एक पळी जास्त वाढेन एवढी नोंद घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना कानपिचक्या दिल्या.