राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे जरी बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिध्द असले तरी त्यांच्या अधून-मधून राजकीय कोट्या करणारा आणि मिश्किल स्वभाव सर्वश्रुत आहे. नुकताच त्यांचा बीड जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर विकास कामांच्या प्रश्नावरून टीका केली. त्यावर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
सभेत बोलताना अजित पवार यांनी बीडमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, आम्ही लातूरवरून निघालो. लातूरच्या सीमेपर्यंत चारपदरी रस्ता. पण बीड आल्यावर रस्ता झाला दोन पदरी. मी धनंजयला (मुंडे) म्हटलं काय आहे हे? तो म्हणाला दादा आम्ही ८ तास उपोषण केलं. ओरडत होतो. पण त्या वेळच्या नेतृत्वानं इथे लक्षच दिलं नाही. इकडं रस्ता दोन पदरीच राहिला, तिथे चार पदरी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या त्या भागातल्या नेतृत्वानं भांडून पैसा आणायचा असतो. त्यांनी त्या वेळी करायला हवं होतं. इथपर्यंतच का? लातूरपर्यंत रस्ता आणि बीडनं काय घोडं मारलंय का? शेवटपर्यंत चारपदरी रस्ता व्हायला हवा होता. आता राहिलं ना काम अर्धवट असे खडे बोल त्यांनी सुणावले.
हे राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे. नितीन गडकरींच्या खात्याचं काम आहे. मग खासदार काय करतात? खासदारांचं हे काम नव्हतं का? अशी सवाल खासदार प्रीतम मुंडे यांना करत ते पुढे म्हणाले की, बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजेत. लोकप्रतिनिधी कमी पडला, तर ही अवस्था होते. त्यामुळे इथून पुढच्या काळात विचारपूर्वक उमेदवारांना निवडून देण्याचं काम जनतेनं करावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांच्या प्रश्न सोडवले पाहिजेत. विकास कामे केली पाहिजे असा सल्ला करत सगळंच काही आयतं मिळत नाही. काही स्वकर्तृत्वही करून दाखवावं लागतं असा टोलाही त्यांनी मुंडे भगिनींना लगावला.
दरम्यान त्याच दिवशी केजमध्ये एका कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाल्या की, मला कळलं की अजित पवारांनी टीका केली. लातूरमधला रस्ता बर्दापूरमध्येच का थांबला? तो बीडमध्ये का गेला नाही? खासदारांनी असं का केलं? मला त्यांना सांगायचं आहे की आपण अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे असा पलटवार करत या खासदारांनी ११ राष्ट्रीय महामार्गांचं जाळं तयार करून त्याची एक वरमाला करून बीड जिल्ह्याच्या गळ्यात घातली आहे. ज्या भागात तुम्ही २५-३० वर्ष नेतृत्व केलं, तिथले देखील राष्ट्रीय महामार्ग आमचंच सरकार आल्यानंतर झाले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.