मराठी ई-बातम्या टीम
मागील दिड महिन्याहून अधिक काळ राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यादाच मत मांडत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनो विलिनीकरणाचे डोक्यातून काढून टाका असे आवाहन त्यांनी विधानसभेत करत एकप्रकारे विलिनीकरण शक्य नसल्याचे ध्वनित केले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शाळा-कॉलेज सुरु झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एसटीच्या संपामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनाही आर्थिक फटका बसत असून खाजगी बस चालकांकडूनही वारेमाप दर आकारणी करून जनतेची लूट करत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी अनिल परब, मी स्वतः अशी बैठक घेतली. त्या बैठकीत गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार पाहून त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात कमीत कमी पाच हजाराची पगार वाढ देत त्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणले तर काही राज्यांच्या जवळपास आणल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असून या वाढीचे स्वागत एसटी कर्मचाऱ्यांनी केली पाहिजे ती वाढ स्विकारली पाहिजे. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयात असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने त्यांचा अहवाल न्यायालयातही सादर केला आहे. मात्र त्या अहवालाच्या अभ्यासासाठी काही दिवसांचा अवधी मागून घेण्यात आलेला आहे. त्या अहवालावर न्यायालयाचा निकाल येईलच असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांनो विलिनीकरणाचा मुद्दा डोक्यातून काढून टाका, एखादी गोष्टी ताणून ताणून त्याची अवस्था मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपासारखी करून कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावू नका असे आवाहन करत कोणाही कितीही अशा पध्दतीने प्रयत्न करेल तो प्रयत्न आम्ही यशस्वी होवू देणार नाही आणि एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लागू देणार नाहीच अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी सभागृहाला दिला.
एकाबाजूला एसटी विलिनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असताना आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयात त्यावरील याचिकाही प्रलंबित आहे. मात्र अजित पवारांनी थेट एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा डोक्यातून काढून टाकावा असे आवाहन केल्याने एसटीचे विलिनीकरण होणे शक्य नसल्याचे तर अजित पवारांनी सूचविले नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.