मराठी ई-बातम्या टीम
देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना एक फाईल माझ्याकडे आली. ती फाईल महत्वाची होती. ती फाईल वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मी त्या फाईलीवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मला फोन आला. त्यांनी त्या फाईलीबाबत विचारणा करत त्यावर अद्याप सही केली नसल्याबद्दल विचारणा केली आणि म्हणाले, देश मे सिर्फ एक महिने का अनाज है, अगले महिने अनाज नही मिलेगा तो जनता गुस्सा हो जायेगी असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत त्यामुळे आपण खुपच अस्वस्थ झाल्याचे सांगितले.
साधारणत: १५ ते २० वर्षापूर्वी देशातील अन्न धान्याचे उत्पादन मुबलक नव्हता असेही ते सांगायला विसरले नाहीत.
८१ वाढदिवसानिमित्त शरद पवारांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.
माझ्याकडे आलेली ती फाईल होती अमेरिका, ब्राझील आणि रशियातून धान्य आयात करण्याची. देशात ५४ टक्के शेतकरी असताना, देशातील नागरीकांच्या पोटाला २ वेळचे अन्न नव्हते या परिस्थितीमुळे मी खुप अस्वस्थ झालो. त्यादिवशी रात्रभर मी अस्वस्थ राहीलो. आम्हाला परदेशातून धान्याची भीक मागण्याची पाळी आली होती. त्यामुळे मी सर्वात आधी शेतकऱ्यांच्या शेत मालाला वाढीव दर देवून त्याला आर्थिक स्वयंपूर्ण बनविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज देशातील शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज जवळपास १७ देशांना आपण अन्न धान्याचा पुरवठा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला मोबदला मिळाला तर तो शेती करेल आणि त्याच्यामुळे इतरांच्या पोटालाही दोन घास मिळतील असे त्यांनी सांगितले.