विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने सर्व महत्वाची खाती घेत शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली असा खोचक आरोप करत मविआ सरकारमध्ये असलेल्या सन्मान कमी झाला आहे का? असा खोचक सवालही शिंदे गटाच्या मंत्र्यांना विचारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला? असे म्हणत मिटकरी यांनी शिंदे गट आणि भाजपावर खोचक टीका केली.
केसरकरांना हवेहवेसे वाटणारे पर्यटन खाते मंगल प्रभात लोढांकडे देऊन फडणवीस यांनी नवा इतिहास रचला आहे. तसेच महिला व बालकल्याण सुद्धा त्यांच्याकडेच दिल्याचा पराक्रम केला आहे, असे सांगत मिटकरी यांनी केसरकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खोचक टीका केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त व नियोजन, गृह विभागा, गृहनिर्माण विभाग, जलसंपदा, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर भाजपाकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्य, ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण, पर्यटन-कौशल्य विकास, ओबीसी, सार्वजनिक बांधकाम, कामगार आदी खाती आहेत.