Breaking News

अजित पवार म्हणाले, अंगाशी आले की लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात… डॉ प्रदीप कुरूलकर यांच्या अटकेवरून भाजपावर साधला निशाणा

‘हनी ट्रॅप’ प्रकरणी आणि देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी यंत्रणेला दिल्याप्रकरणी डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. डॉ कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुरूलकर यांचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यावर राज्य कार्यसमितीच्या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी पुण्यात आले असताना त्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले होते. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी कुरूलकर प्रकरणात सत्ताधारी काही बोलत नाहीत, याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधले. तेव्हा ते म्हणाले, की कुरुलकर यांनी जे काही केले तो देशद्रोह आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे समोर आले आहेत. अशा व्यक्तींवर जबरदस्त कारवाई केली पाहिजे. त्याकरिता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले गेले पाहिजे. जेणेकरून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कोणत्याही स्वरूपात माफ केले जाणार नाही, हा संदेश गेला पाहिजे.

कुरूलकर हे कोणाशी संबंधित होते, यांची माहिती पत्रकारांनी आणि जनतेनेही खोलवर जाऊन घेतली पाहिजे, असे सूचक वक्तव्यही विरोधी पक्षनेते पवार यांनी केले. अंगाशी आले की काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात, असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेता या वेळी लगावला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *