दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी २४ मे रोजी भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे लोक लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. पण, हे लोक मुळात लोकशाही मानणारे नाहीत. लोकशाहीच्या गोष्टी करून हे लोक स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सापनाथ-नागनाथ सगळे एकत्र येत आहेत. तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. हा केवळ एक शब्दप्रयोग आहे. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले तरी ते मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नाना पटोलेंना विचारलं. त्यावर पटोले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री गारूडी आहेत, तर उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत. दुसऱ्यांना नागनाथ आणि सापनाथ म्हणणं याचा परिणाम काय होतो, हे उत्तर प्रदेशात पाहिलं आहे. तसेच, आता महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे स्वत:चं घोषवाक्य स्वत:ला लावायचं, असं त्यांचं मत होत का? आम्ही संविधानाचे रक्षक आणि जनतेच्या हिताचे लढाई लढणारे लोक आहोत.
लोकसभेच्या नव्या इमारतींचं उद्घाटन होत आहे. ही इमारत माती आणि विटांची नसते. तेथे संवैधानिक मुल्ये जोपासली गेली पाहिजेत. हे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. त्याठिकाणी संविधानाची जोपासना केली जात नाही. राष्ट्रपतींचा अपमान करणं, हे संवैधानिक व्यवस्थेला संपवण्याचं काम आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.