टाटा सन्सचे माजी प्रमुख आणि शालनजी पालनजी उद्योग समुहाचे संचालक सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले असून यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली.
पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.
पालघरनजीक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे, अशी मााहिती यावेळी त्यांनी दिली.
त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति !
पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.
(2/2)#cyrusmistry #mumbai— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 4, 2022