Breaking News

टास्कफोर्स स्थापून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे : नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

मुंबईतील अ-९ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे. डॉ सुधीर ढोणे, डॉ. संजय लाखे पाटील, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते परंतु मोदी सरकारने हा आत्माच संपवण्याचे काम सुरु केले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करुन कोर्टाने कोविडमध्ये हस्तक्षेप करु नये, कोर्ट या विषयातील तज्ञ नाही असे म्हणत कोर्टाचा अवमान केला आहे. नोटाबंदी जाहीर करताना नरेंद्र मोदींनी कोणत्या अर्थतज्ञांचा सल्ला घेतला होता का? नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का ? तसे नसतानाही नोटंबदी जाहीर करुन लोकांना वेठीस धरले. सुप्रीम कोर्टात यापूर्वी कोलगेट, टू जी प्रकरण आले होते त्यावेळच्या युपीए सरकारने कोर्टाला अशा प्रकारे हस्तक्षेप करु नका असे म्हटले नव्हते. सुप्रीम कोर्टाने देशातील कोवीडची विदारक परिस्थिती पाहूनच टास्क फोर्स स्थापन केला आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आकलन करुन मोदी सरकारने नियोजन केले नाही त्यामुळे हजारो लोक ऑक्सीजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी लोक मरत आहेत. शेकडो मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने क्रूरपणे दफन केली जात आहेत तर शेकडो नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत. लस नाही, औषध नाही, ऑक्सीजन नाही, पीएम केअरमधून पुरवलेली उपकरणेही दुय्यम दर्जाची आहेत. मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली आहे. कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात  भारताची नाचक्की झाली आहे. 

भारत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामारीचा मुकाबला करत नाही. यापूर्वी आलेल्या गोवर, देवी तसेच पोलीओचा मुकाबला भारताने समर्थपणे केला आहे. २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले त्यावेळी पोर्टल, ऍप, ओटीपी असे काही नव्हते तरीही ठोस धोरण आखून तत्कालीन काँग्रेस सरकारने पोलीओचे समूळ उच्चाटन करुन दाखवले, ती धमक मोदी सरकारमध्ये दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी, राहुलजी यांनी कोरोना संकटाच्या गंभीर परिणामाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. वेळीच त्यांचा सल्ला ऐकून कार्यवाही केली असती तर देशाला आजच्यासारख्या विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपाचे नेते हे सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसेच भाजपाच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनियाजी व राहुलजी यांच्याबद्दलचे कालचे वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतूनच तसेच सत्तेच्या मस्तवालपणातून आले आहे. विरोधकांनी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही ते म्हणाले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *