विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी आलोय मी तळमळीने बोलणार असून मला खोटं बोलता येत नाही. मागील काही दिवसांपासून जी काही बदनामी सुरु केलीय तुम्ही लोकांनी त्या बद्दल मी काही बोलणार नाही. पण किती खालच्या स्तरापर्यंत करायची याला काही धरंबद आहे का? सारखं सारखं दाऊद दाऊद असा नामोल्लेख सुरु आहे. पूर्वी राम मंदीराच्या नावावर मते मागितली आता काय दाऊदच्या नावावर मते मागणार का ? असा खोचक सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना केला.
अमेरिकेच्या ओबामाने ओसामाच्या नावावर मते मागितली नव्हती, की पाकिस्तानात हेलिकॉप्टरने सैन्य पाठवायचे की, विमानाने सैन्य पाठवायचे म्हणून काथ्याकुट केला नाही. त्यांनी थेट सैन्य पाकिस्तानात पाठविले आणि ओसामाचा खात्मा केला अन त्यानंतर जगाला सांगितले, याला मर्दपणा म्हणतात असा उपरोधिक टोला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष लगावत त्यानंतर जगाला सांगितले. मात्र दाऊद जीवंत आहे की नाही माहिती नाही मात्र रोज त्याचे साथीदार शोधण्याचे काम सध्या सुरु आहे. याचे संबध त्याचेशी त्याचे संबध याच्याशी म्हणून रोज नवनवे आरोप करण्याचे काम सुरु आहे. असेल हिंमत तर थेट पाकिस्तानात पाठवा ना सैन्य आणि आणा त्याला परत पण ते करणार नाही असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
काही जणांनी दहिसर येथील जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्याची सुरुवात कशी झाली हे सांगतो असे म्हणत यावरीलच्या कागदपत्रावर विरोधकांच्या दिशेकडे पहात मुख्यमंत्री म्हणाले याची सुरुवात तुम्हीच केलीत त्या कागद पत्रावर तुमची सही आहे. त्यानंतर त्यावेळचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एक पत्र पाठविले असे सांगत त्यांचे हे नाव इथे घेतले तर चालते ना नाही तर केरळचे उत्तर तामीळनाडूला दिले असे व्हायला नको असा चिमटा काढत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, त्या जमिनीची किंमत मला वाटतं त्यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे होते त्यांच्याच विभागाने या जमिनीची किंमत ९०० कोटी रूपये ठरविली. त्यावर तुमची पण सही आहे. मात्र या जमिनीबद्दलचे पत्र सर्वात आधी मनिषा चौधरी यांनीच दिले होते. त्या जमिनीवर चांगले रूग्णालय हवे की नकोय ते मला इथेच सांगा असे थेट विचारले. तसेच केवळ आशिष म्हणतोय म्हणून तुम्ही गप्प बसू नका तुम्ही बोला असे सांगत त्यांना बोलते केले. तसेच जमिनीची किंमत महापालिका ठरवित नाही तर महसूल विभाग ठरवितो असे स्पष्ट करत पैसे जास्तीचे गेले म्हणून मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला म्हणून हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही असे सांगत फडणवीसांच्या आरोपातील हवा काढली.
जर पहाटेचा तुमचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्हीच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मांडीशी मांडी लावून बसला असतात. मात्र आता आमची सत्ता आली म्हणून तुम्हाला सगळा भ्रष्टाचार आणि दाऊदचे संबध असल्याचे दिसत आहेत असा उपरोधिक टोला त्यांनी लागवला.
छत्रपतींच्या महाराष्ट्राला तुम्ही मद्यराष्ट्र म्हणून म्हणालात पण सर्वाधिक मद्यविक्रीची दुकाने ही मध्य प्रदेश आणि गोव्यात असून या दोन्ही ठिकाणी आपलीच सत्ता आहे याची आठवण करून देवून कृपया महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून असा इशारा देत तुम्ही (भाजपा) म्हणजे असे आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे किंवा स्वतःचे ठेवावे झाकून अन… असा उपरोधिक टोलाही त्यांनी लागवला.
मागील काही दिवसांपासून ईडीचे दलाल कोण आणि प्रवक्ते कोण हे कळेनासे झाले आहे. केंद्रीय यंत्रणांनाही सध्या काही काम असल्यासारखे दिसत नाही. त्यामुळे ईडीचेही सध्या द्या पुरावे आणि मग आम्ही ह्याला ठोकतो, त्याला ठोकतो असे चाललेय. तसेच विरोधकांचे म्हणजे यंत्रणाही त्यांच्याच आरोपही त्यांचेच आणि उत्तरेही त्यांचेच असा उपरोधिक टोला त्यांनी लगावत ईडीचा वापर दाऊदच्या मागे फरफटत जाण्यासाठी भाजपाने घरगड्यासारखा केल्याचा आरोप करत मागे स्व.गोपीनाथ मुंडे हे ही गृहमंत्री होते. त्यावेळी ते म्हणाले होते की मी दाऊदला फरफटत आणेन पण आता कोणाची फरफट होत आहे असा कुच्छित सवालही त्यांनी यावेळी केला.
कोविड काळात कोविड सेंटर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आपण निविदा मागविल्या त्या निविदा अपेक्षेपेक्षा जास्त दराने आल्या. मात्र आम्ही त्या योग्य दरानेच कोविड सेंटर्स दिली. त्यामध्ये एकाही पैशाचा भ्रष्टाचार झाला नाही. तसेच मुंबई महापालिकेकडूनही एकही गोष्ट उशीराने मागितली नाही वेळेतच त्याची निविदा काढून मागविण्यात आल्याचे सांगितले.
देशाच्या अमृत महोस्तव निमित्त आम्ही ८०० कोटींची तरतूद केलीय. तुम्ही ही आकडेवारी आतापासूनच लक्षात ठेवा असा सांगत नाहीतर कालांतराने तुम्हाला यातही भ्रष्टाचार दिसायला लागले असा खोचक टोला लगावल काही जणांना सध्या द्वेषाची कावीळ झाला असून त्यांना भ्रष्टाचाराशिवाय किंवा वाईटाशिवाय काही दिसत नसल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
धारावी पुर्नविकास प्रकल्प करायचाय, रेल्वेच्या जमिनीसाठी आम्ही पाठपुरावा करतोय पण जमिन मिळत नाही. बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामांतरण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. पण केंद्र सरकारकडून सहकार्य होत नाही. उलट केंद्र सरकारने पालकाच्या भूमिकेत रहावे अशी भूमिका असताना त्या भूमिकेत केंद्र रहात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मात्र न्यायालये ही हल्ली एकसुरी निर्णय देत आहेत असा गंभीर आरोप करत हा धृतराष्ट्राचे आंधळे राज्य नसून हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे इथे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पहात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर २०१४ लाही कडवट हिंदू होतो, आहे आणि राहणार असे सांगत माझ्या इथल्या सगळ्या सहकाऱ्यांना याची माहिती आहे. मात्र मी सत्तेसाठी कधीही तुम्ही जशी काश्मीरात मेहबूबा मुफ्ती सोबत केले तसे आम्ही करणार नाही. केवळ मी तुम्हाला सोडले म्हणून तुम्हाला सगळे आमचं वाईट दिसत असल्याचा आरोप करत जसा एखाद्याचा जीव पोपटात अडकलेला असतो तसा माझा जीव मुंबई आणि महाराष्ट्रात अडकल्याचे सांगत जे जे चांगल्या गोष्टी असतील त्या गोष्टी मुंबईत हव्यात असा माझा प्रयत्न असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तुम्हाला काय टीका करायची ती माझ्यावर करा पण मुंबई आणि महाराष्ट्रावर करू नका असे आवाहनही त्यांनी विरोधकांना दिला.