Breaking News

उध्दव ठाकरेंचा टोला, आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान की गावचा सरपंच कोल्हापूरच्या ऑनलाईन निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री ठाकरेंची टोलेबाजी

आमच्या बॅनरवर हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मात्र तुमच्या बॅनरवर लालकृष्ण अडवाणी आहेत, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आहेत. मात्र तुमच्या गावच्या सरपंच पदासाठीही तोच फोटो, पंतप्रधान पदासाठीही तोच फोटो आणि राज्याच्या निवडणूकीतही तोच फोटो त्यामुळे आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की, गावचा सरपंच आहे असा खोचक टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

उत्तर कोल्हापूरमधील पोट निवडणूकीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन सभेच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

तसेच मध्यंतरी काही जणांनी स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना झिडकारलं त्यामुळे त्यांनी तो अखेर नाद सोडला असा उपरोधिक टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावत हिंदू हृदयसम्राट म्हणून फक्त एकाच व्यक्तीचे नाव पुढे येत ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच असेही त्यांनी सांगितले.

२०१९ च्या निवडणूकीवेळी भाजपाने युती तोडली. आम्ही युती तोडली नाही. त्यावेळी सगळं जुळत आले होते. पण एकेदिवशी ते आले आणि म्हणाले आपलं काही होणार नाही. त्यामुळे आपण स्वतंत्र लढू या असे म्हणत त्यांनी युती तोडली. ज्या चार भिंतीत अमित शाहने मला वचन दिले. ते वचन तुम्ही तोडलात. का तोडलात याचे उत्तर तुम्ही का देत नाही असा सवाल करत भाजपाला ४० हजार मते मिळाली, शिवसेनेला ४७ हजार मते शिवसेनेला मिळाली आणि काँग्रेसला ९१ हजार मते मिळाली. मग तुमची ४० हजार मते कोणाला गेली असा सवाल करत छुपे पणाने तुम्ही तेव्हा काँग्रेसलाच मते दिल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र आम्ही जे काही करतो ते खुले पणाने करतो. आम्हाला तुमच्या सारखे छुपेपणाने करण्याची गरज नाही असे सांगत काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिलेला असून जयश्री जाधव यांना सच्चा शिवसैनिक मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत प्रेमाने आलात तर अफजलखानाप्रमाणे गळाभेटही देवू पण जर अफझलखानाप्रमाणे पाठीत वार कराल तर समोर आम्ही हल्ला केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपाला यावेळी दिला.

हिंदूतत्वावरून तुम्ही म्हणजे भाजपा सारखे ओरडत असता की शिवसेनेनं हिंदूत्व सोडलेले आहे. पण खरेतर आम्ही तुम्हाला सोडलंय हिंदूत्वाला सोडलेले नाही. मी तेव्हाही हिंदूच होतो आणि आजही हिंदू आहे. आमचं हिंदूत्व हे हिंदू अडचणीत जेव्हा असतील तेव्हा धावून जाण्याचे हिंदूत्व आहे. त्यासाठी सारखं आम्हाला सांगावं लागत नाही. तुमच्या एकट्याचा भगवा हा काही खरा भगवा नाही तर तो नकली, खोटा भगवा असल्याची टीका भाजपावर करत ते पुढे म्हणाले खरा भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा असून त्याचेच अनुकरण शिवसेना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *