कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आयोजित सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब असताना आमच्यावर टीका झाली की बाळासाहेब मराठी मराठी करतात आणि त्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. होय माझी दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. परंतु त्यावेळी मला बाळासाहेबांनी बोलावून सांगितले की तुझी मुलं जरी इंग्रजी माध्यमात शिकत असली तरी घरात मात्र मराठीत बोलली पाहिजेत असा दंडक घातला. त्यामुळे माझी मुलं घरात आणि बाहेरही मराठी बोलत असल्याचे सांगितले.
कोणत्याही भाषेचा द्वेष नसावा पण आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर असावा असे सांगत महाराष्ट्रात दर १२ कोसाला मराठीतील वेगळा प्रकार ऐकायला मिळतो. मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी यासह अन्य प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. या सर्व भाषांना आपला गौरव होणं महत्वाचं असून मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे नुसतं वाटून उपयोग नाही. तर त्याचा वापरही झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करत मी जर्मनीला गेलो असताना तेथे माझा एक मित्र राहतो. त्याची पत्नी जर्मन आहे. मात्र ते घरात असले की इंग्रजीत बोलायचे आणि बाहेर मात्र जर्मन भाषेत बोलायचे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषेच्या फक्त पाट्या लावण्याचा निर्णय आपण नुकताच घेतला. परंतु या पाट्या नुसत्या लावून उपयोग नाही तर मराठी माणसाने दुकानदारीमध्येही उतरलं पाहिजे. मुंबईसह प्रत्येक शहरात मराठी भाषिक हा फक्त नोकऱ्या मागताना दिसायला नको असे सांगत मराठी मुलांनी फक्त नोकऱ्या मागणारे नाहीतर नोकऱ्या देणारे बनले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आपण एखादेवेळी परदेशात गेलो तर तेथे आपणाला त्यांच्या भाषेत बोलण्याशिवाय पर्याय नाही. पण तोच परदेशी व्यक्त मुंबई आणि महाराष्ट्रात आला तर त्याला आपल्या भारतीय भाषेचा किंवा इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागणार. त्यामुळे आपण कायम मराठीत बोलत राहीलो तर आपल्या येणारे मराठी शिकतील आणि ते ही मराठीत बोलतील असे त्यांनी सांगितले.
गाव तेथे पुस्तकालय ही संकल्पना आपण राबवित असून या पुस्तकालयात मराठीच्या विविध भाषेची ओळख करून देणारी अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी भाषेशी संबधित पुस्तकेही ठेवणार असल्याचे आणि जुनी मराठी पुस्तकेही तेथे उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.