मागील दोन वर्षापासून कोविड संसर्गाजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर य़ांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र आवश्यक नियमावलींचे परिपत्रक गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करू यात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत त्यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे डॉ बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे आयोजित कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री संजय बनसोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे, मा. खा. भालचंद्र मुणगेकर, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, आनंदराज आंबेडकर, भंतेजी राहुल बोधी, समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित.
