मुंबई: प्रतिनिधी
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहे. विरोधकांकडून टीका करण्यात आली असली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे म्हणजे महाराष्ट्रासाठी यापेक्षा दुर्दैवी काही नसल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला असून त्यावर दरेकर म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थप्पड मारणारी भाषा केली असेल तर यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. विरोधकांना पक्ष पातळीवर उत्तर देता येईल किंवा ते उत्तर देणारे सुद्धा आहेत. पण अशा प्रकारची टीका करणं संयुक्तिक नसल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
मराठी माणसांना जेव्हा हक्काची घरं मिळतील तोच खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण
वरळी नायगाव, ना. म जोशी मार्गावरील बिडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा २२ एप्रिल २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी जांबोरी मैदानात झाला होता. संपूर्ण आराखडा तयार करून त्यांच्या निविदा काढून कार्यादेश सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एका प्रकल्पाच दुसऱ्यांदा भूमिपूजन होत असल्यामुळे राज्य सरकार वेळकाढूपणा तर करत नाही ना ? असा सवाल करतानाच महाविकास आघाडी सरकारने आता विलंब न करता हा प्रकल्प गतीने व सांगितलेल्या वेळेत पूर्ण करावा. वरळी येथील मराठी माणसांना जेव्हा हक्काची घरं मिळतील तोच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी आनंदाचा क्षण ठरेल असे ही ते म्हणाले.
वरळी येथील रहिवाश्यांना लवकर हक्काची घरं मिळणार असेल तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकल्पामध्ये जातीने लक्ष घालून सर्व परवानग्या मिळवल्या होत्या. प्रकल्पाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या, वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रीतसर भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते. परंतु आज दीड वर्षानंतर विलंब करत परत आज त्याच प्रकल्पाच भूमिपुजन होत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.